अवलोकिती सकल लोक । सुखनिधान गुणवितान ।
सावकाश सावधान ॥
उदासीन गगनगता । तुच्छ गमति धराशायि ।
पूजिति, नच तो विलोकी । जन अनाथ । गगननाथ ।
सावकाश सावधान ॥
गीत | - | श्रीपाद कृष्ण कोल्हटकर |
संगीत | - | वझेबुवा |
स्वर | - | रामदास कामत |
नाटक | - | संन्याशाचा संसार |
चाल | - | 'परब्रह्म परमेसर’ या चालीवर. |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
अनुराग | - | प्रेम, निष्ठा. |
निधान | - | खजिना / स्थान. |
विचरणे | - | हिंडणे, भटकणे. |
वितान | - | छत. |
विलोकी | - | दृष्य. |
शायी | - | निजणारा. |
संदेश, इंदुप्रकाश व हिंदु मिशनरी या पत्रांनी आपले स्पेशल अंक काढून मला ऋणायित करून ठेविलें आहे. मुंबई व पुणें येथील प्रेक्षकवर्गाच्या गोट ऋणांतून तर मी केव्हांही मुक्त होऊं इच्छित नाहीं.
प्रस्तुत नाटक लिहून रंगभूमीवर आणलें जात असतांना माझे मित्र रा. यशवंत नारायण टिपणीस, रा विश्वनाथ गोपाल शेट्ये, रा. विश्वनाथपंत थत्ते, रा. मनसुखराम आनंद घुमे, रा. पुरुषोत्तमराव जयवंत, रा. बळवंतराव पेंडसे, रा. व्यंकटराव पेंढारकर, रा. एकनाथ नारायण वाड, रा. आत्माराम धोंडो कापडी प्रभृति मित्रांनी मला जें परोपरीनें सहाय्य केलें, त्याजबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहें.
प्रस्तुत नाटकांत पुट्टूपंडिताचें काम करणारे नट रा. गोपाळराव गुत्तीकर या ब्राह्मण गृहस्थांचा श्रीमती सुंदराबाई चुटेकर या मराठा मुलीशीं हिंदु-मिशनरी संस्थेच्या विद्यमानें हें नाटक रंगभूमीवर आल्यानंतर थोड्याच दिवसांनीं मिश्र-विवाह झाला, ही गोष्ट येथें स्मरणार्थ नमूद केल्यास अस्थानीं होणार नाही.
(संपादित)
भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. १ मे १९२०
'संन्याशाचा संसार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- भार्गवराम विठ्ठल वरेरकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
शंकराचार्यांचा असो किंवा मिशनर्यांचा असो, उकिरडा उपसून दोघांच्याही मठांतील घाणी चव्हाट्यावर आणणें अशक्य नव्हतें; पण, असल्या विघातक मार्गापेक्षां प्रस्तुत नाटकांत अवलंबिलेला विधायक मार्गच मला बरा वाटला.
हिंदू मिशनरी संस्थेच्याद्वारें कै. गजाननराव वैद्य यांनीं जरी मोठें अद्वितीय कार्य करून ठेविलेलें आहे तरीही बर्याच व्यक्तींना शंकरचार्यांच्या करवींच परावर्तन व्हावें अशी भोळी इच्छा असल्याचें दिसून येतें. माझे मित्र "महाराष्ट्र" पत्राचे संपादक श्री. गोपाळराव ओगले यांनीं सतत आठ वर्षें भगीरथ प्रयत्न करून एका शंकराचार्यांकरवीं एक वर्षापूर्वीं एका हिंदू खिस्त्याचें परावर्तन एकदांचें करवून घेतलें ! पाद्यपूजेच्या पिण्डावर पोसल्या जाणार्या या शंकराचार्याला त्यानंतर दुसरें एकादें परावर्तन करण्याचा धीरच झाला नाहीं काय? कै. गजाननराव वैद्य ह्यांचें कार्य पाहिलें ह्मणजे असल्या शंकरचार्यांची गजाननरावांच्या पायधुळीइतकीही किंमत वाटत नाही !
शंकराचार्य नसतांही एकटे स्वामी श्रद्धानंदजीच हें कार्य जिवावर उदार होऊन करीत आहेत. त्या कार्याला यश येण्याचा सोन्याचा दिवस, स्वराज्याइतकाच अजून दूर आहे काय?
नाटकानें कांहीं कार्य होतें कीं नाहीं याचा पुरावा सांपडणें कठीण आहे तरीही ह्या नाटकानें एक कार्य केलें. परंपरेच्या दुराग्रहाचा लोखंडी साखळीदंड वितळण्याइतकी ह्या नाटकाच्या परिणामाची आंच लागून मराठी बायबलची भाषा सुधारली गेली ! आणि सर्वात विशेष गोष्ट ही कीं, हें नाटक बंद करण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याच गडबडगुंड्यांतून हें सुपरिणामाचें फल प्राप्त झालें. हें कार्य ज्या हिंदू खिस्त्यांनी घडवून आणलें त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.
पतितपरावर्तनाचा विषय व्यवहारीबुद्धीला किती अप्रिय आहे याचा प्रत्यक्ष पुरावा ह्मणजेच या नाटकाची ही द्वितीय आवृत्ति आहे. या नाटकाचा अत्यन्त अभिमान बाळगणारा माझा एक मित्र व्यावहारिक संबंध येतांच आपली स्वाभाविक सहृदयता कशी विसरला ह्याच्या प्रत्ययाने अजूनहीं नकळत माझ्या डोळ्यांत आंसवें येतात.
या नाटकाची पहिली आवृत्ती संपून जवळ जवळ पांच वर्षे होत आलीं तरीही त्याची दुसरी आवृत्ती घेण्यास कोणीही प्रकाशक धजावेना ! असें असूनही आज ही दुसरी आवृत्ती माझ्या सुदैवानें प्रसिद्ध होत आहे याबद्दल परमेश्वराचे आभार मानितों.
(संपादित)
भार्गवराम विठ्ठल वरेरकर
दि. १ जुलै १९२६
'संन्याशाचा संसार' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- भार्गवराम विठ्ठल वरेरकर (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.