प्राण हा सर्वथा जाऊं पाहे
हरिणीचें पाडस व्याघ्रें धरियेलें
मजलागी जाहलें तैसे देवा
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धांवे हो जननी विठाबाई
मोकलुनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
गीत | - | संत कान्होपात्रा |
संगीत | - | आनंदघन |
स्वराविष्कार | - | ∙ पं. हृदयनाथ मंगेशकर ∙ संजीव चिम्मलगी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | साधी माणसं |
गीत प्रकार | - | चित्रगीत, संतवाणी |
टीप - • स्वर- पं. हृदयनाथ मंगेशकर, संगीत- आनंदघन • स्वर- संजीव चिम्मलगी, संगीत- कौशल इनामदार. |
मोकलणे | - | पाठविणे / मोकळा सोडणे. |
महाराष्ट्राच्या भूमीला प्रतिभावंत संतांची समृद्ध परंपरा लाभल्यामुळेच इथल्या लोकसंस्कृतीला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक विचारांचा वसा-वारसा मिळाला. पुढच्या पिढ्यांच्या जडणघडणीवर त्याचा परिणाम होताना दिसतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताई आदी संतकवींनी भागवत संप्रदायाच्या तत्त्वप्रणालीची रुजवणूक करताना आपले आयुष्य पणाला लावले. त्याच परंपरेतील एक महत्त्वाची कवयित्री संत कान्होपात्रा.
पंढरपूरपासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर असणार्या मंगळवेढे या गावी श्यामा नायकिणीच्या पोटी शके १३९० च्या कालखंडात कान्होपात्रेचा जन्म झाला. अत्यंत देखणी कान्होपात्रा स्वत:विषयी, आईविषयी, समाजाविषयी अनेक प्रश्न मनात घेऊन लहानाची मोठी होत होती. संवेदनशील कान्होपात्रा जेव्हा ऐन तारुण्यात भक्तिरसात बुडून पांडुरंगचरणी सर्वस्व अर्पण करते व आईच्या पारंपरिक देहविक्रयाच्या व्यवसायाला नकार देते, तेव्हा जणू एक प्रकारे तिची लालसा धरून असलेल्या अनेक लब्धप्रतिष्ठित म्हणवल्या जाणार्यांच्या विरोधात ती विद्रोह मांडते. हीन कुळात जन्माला आल्यामुळे व त्यात पुन्हा सुंदर असल्यामुळे पवित्र राहण्याचा कितीही प्रामाणिक प्रयत्न केला तरी समाजाने तिचे सन्मानाचे जिणे नाकारल्याची सुईबोचरी वेदना तिला नेहमीच व्याकूळ करत राहिली. या दु:खार्त भावनेचा उत्कट आविष्कार तिच्या अभंगरचनेतून पदोपदी जाणवत राहतो. कवितेला अनुभवाचाच शब्द लागतो आणि तो तिच्याकडे होता. नामदेवाची उत्कट अभंगवाणी आपल्या गोड गळ्यातून गाताना ती देहभान हरपून जात असे. त्यामुळे कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या तिच्या अभंगांतून अस्वस्थ आणि उद्विग्न मनाचे दर्शन घडते. हळव्या वयाच्या तारुण्यसुलभ भावनेतून पांडुरंगाबद्दल वाटणार्या प्रेम, जिव्हाळा आणि असीम भक्ती यातून तोच तिचा सखा सर्वेश्वर होऊन बसतो. दीन-दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ अशी त्याची ख्याती असल्यामुळे या हीनत्वाच्या दलदलीतून तोच आपली सुटका करील, असा तिचा विश्वास वाटू लागतो. 'आधी भक्त मग देव' या तत्त्वप्रणालीप्रमाणे भक्ती ही कान्होपात्राची जीवननिष्ठा बनली होती. कान्होपात्रेच्या अभंगातून तिच्या दु:खभोगाचे प्रतिबिंब उमटताना दिसते. कान्होपात्रेच्या अभंगाचा उगमच मुळात द्विविध स्वरूपाचा असून जितका उत्कट तितकाच सहजभाव दाखवणारा आहे.
दिवसेंदिवस तिच्या सौंदर्याच्या लालसेतून आक्रमक होत जाणार्या मनोवृत्तीमुळे तिचे निर्मळ मन गढूळ होण्याच्या भीतीने धास्तावून जाते.
'पुरविली पाठ न सोडी खळ,
अधम चांडाळ पापराशी'
या अस्वस्थ मनोवस्थेतून ती पांडुरंगाला वारंवार साकडे घालते तर कधी उद्विग्न होऊन अभंगातून त्याच्याशी भांडत राहते.
'वायांच म्यां देवा धरिली आवडी, न पावे थोडी काही केल्या'
आजूबाजूच्या समाजाशी स्वत्त्व जपण्यासाठीचा संघर्ष करत भक्तिरसात तल्लीन असताना तिच्या रूपसौंदर्याचा बोलबाला सर्वदूर झालेला असतो. त्याचा परिणाम म्हणजे बादशहाचे दूत तिचे घर पुसत तिच्या दाराशी येऊन पोहोचतात. तेव्हा तिच्या आंतरिक वेदनेचा कडेलोट होतो. जेव्हा रक्षकच भक्षक होतात तेव्हा न्याय तरी कुठे मागावा? तेव्हा दूताजवळ थोडी वेळेची मुदत मागून ती पंढरपूरच्या पांडुरंगासमोर उभी राहते व आपल्या शीलाच्या जपवणुकीसाठी करुण विनवणी करताना तिच्या आर्त व्याकूळ वेदनेला प्रतिभेचा सुगंध प्राप्त होतो.
नको देवराया अंत आता पाहूं, प्राण हा सर्वथा फुटो पाहे ॥
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेलें, मजलागी जाहले तैसे देवा ॥
या अभंगात कान्होपात्रेची अगतिकता शब्द-शब्दातून पाझरते व तिची करुण मूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. एखाद्या सामर्थ्यशाली शक्तीने दुबळ्या जीवावर प्राणघातक हल्ला करावा. 'आपुले मरण पाहिले म्या डोळा' या जाणिवेतून होणारी प्राणांतिक तडफड कासावीस करणारी असते. अगदी त्याचप्रमाणे 'प्राण हा सर्वथा फुटो पाहे' ही तडफड, ही हतबलता इथं व्यक्त होते. काही केल्या पांडुरंग आपल्या मदतीला धावून येत नाही हे जाणवल्याने एक प्रकारची उदासी तिच्या मनाला येते आणि मग शरीराची विटंबना होऊन मरण्यापेक्षा आधीच आत्मत्याग केलेला काय वाईट, असं म्हणत 'तू आता मला तुझ्यातच सामावून घे' ही आत्मसमर्पणाची समंजस भूमिका ती घेते. तीच पुढे कान्होपात्रेला अध्यात्मातील सर्वश्रेष्ठ उंची मिळवून देते.
आपल्या जगण्याला नितळ-निर्मळ ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारी कान्होपात्रा तिच्या जीवनचरित्रातून आणि निवडक २३ अभंगांतून समाजापुढे संवेदनशील प्रश्न उपस्थित करत राहते.
(संपादित)
डॉ संजीवनी तडेगावकर
सौजन्य- दै. दिव्य मराठी (१८ जानेवारी, २०१३)
(Referenced page was accessed on 22 September 2018)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
लहानपणी शब्दांचा अर्थ कळायचा नाही पण शब्द गाण्याचा अविभाज्य घटक आहे एवढं मात्र ध्यानात आलं होतं. मग हळूहळू शब्दांचा अर्थ कळत गेला पण त्यांच्यामागचा भाव काय आहे हे पुरतं समजण्याचं शहाणपण नव्हतं. संगीत क्षेत्रात आल्यावर मात्र कान्होपात्रेच्या शब्दांतली आर्तता उमगत गेली.
परंतु दर वेळी हा अभंग ऐकताना काहीतरी खटकायचं. खरं तर इतकी सुंदर चाल, त्यात पंडितजींचा भावविभोर आवाज – काय चुकत असेल? पण हे गाणं ऐकलं की एक अनामिक बेचैनी यायची. मग एक दिवस सहजच हे गाणं गुणगुणत असताना अचानक एक खुलासा झाला. अभंगाच्या वृत्तात दुसर्या आणि तिसर्या चरणात यमक असतं. म्हणजे हा एकनाथांचा अभंग पहा,
देह शुद्ध करोनी । भजनी भजावे ।
आणिकांचे नाठवावे । दोष गुण ॥
किंवा मग तुकारामांचा अभंग बघा,
सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।
कर कटावरी । धरोनिया ॥
अथवा नामदेवांचा अभंग,
लंबोदरा तुझा । शोभे शुंडादंड ।
करितसे खंड । दुश्चिन्हांचा ॥
मग पुन्हा एकदा कान्होपात्रेच्या अभंगाकडे नजर गेली. इथे मात्र चित्र वेगळं दिसत होतं.
नको देवराया । अंत अता पाहू ।
प्राण हा सर्वथा । जाऊ पाहे ॥
'पाहू' आणि 'सर्वथा'? याचा ताळमेळ काही बसेना! कान्होपात्रेनी मीटरची चूक कशी काय केली? बरं! पुढे पहावं तर बरोब्बर सगळं वृत्तात होतं! कारण-
हरिणीचे पाडस । व्याघ्रे धरियेले ।
मज लागई जाहले । तैसे देवा ।
तुजविण ठाव । न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी । विठाबाई ॥
मोकलोनी आस । जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस । हृदयात ॥
हे पाहिल्यानंतर मात्र माझ्या ध्यानात आलं की कान्होपात्रा काही वृत्तात चूक करेल अशी शक्यता नाही! गाण्यासाठी शब्द बदलल्याची शक्यता जास्त होती इथे. पूर्वी छबिलदास शाळेच्या बाहेर अभंगांची पुस्तकं विकणारे विक्रेते बसायचे. ह्या पुस्तकांतूनही असेच शब्द लिहिले होते जसे ते गाण्यात होते. यावरून इतकंच सिद्ध होतं की आपल्या समाजमनावर गायल्या गेलेल्या शब्दाचा आणि विशेषतः मंगेशकरांनी गायलेल्या शब्दाचा किती पगडा आहे! या घटनेमुळे माझी जिज्ञासा अधिकच चाळवली गेली. मला खात्री होती की कान्होपात्रेचे शब्द वेगळे असणार.
मी शंकर वैद्य सरांना फोन लावला आणि त्यांना माझ्या मनात उपस्थित झालेला प्रश्न सांगितला. शंकर वैद्य सरांनी नेहमीप्रमाणे माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले – "तुझं म्हणणं बरोबर आहे. मलाही हा अभंग आठवत नाहीये, पण 'सकल संत गाथा' या ग्रंथात तुला या अभंगाचे योग्य शब्द सापडतील."
मी त्वरित मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात जाऊन 'सकल संत गाथा' हा ग्रंथ तपासून पाहिला आणि मला या अभंगाचे कान्होपात्रेने लिहिलेले शब्द सापडले! जो शोध लागला त्याने मी चक्रावून गेलो.
कान्होपात्रेने लिहिलेले शब्द होते,
नको देवराया । अंत पाहू आता ।
प्राण हा सर्वथा । फुटो पाहे ॥
मी एक शोधायला गेलो आणि दुसरंच धन हाताला लागलं होतं! पाणी सापडेल म्हणून जमीन खणायची आणि तिथे तेल लागतं असा आनंद मला झाला. वृत्त तर बरोबर होतंच पण चौथ्या चरणाचे शब्दही वेगळे होते! ते शब्द 'जाऊ पाहे' असे नसून 'फुटो पाहे' असे होते. एका क्रियापदाच्या बदलाने या अभंगाचं पूर्ण डायमेन्शन, त्यातली इन्टेन्सिटीच बदलून गेली होती. 'जाऊ पाहे' या शब्दांमध्ये एक निष्क्रिय भाव आहे पण 'फुटो पाहे' हे शब्द येतात आणि त्या पहिल्या बंधाची उत्कटता शंभर पटीने वाढते. 'फुटो पाहे'मध्ये एक प्रतिकार अपेक्षित आहे. निर्विकारपणे प्राण सोडणारा आणि आयुष्यासाठी प्राणांतिक लढा देणारा यांच्यामध्ये जो फरक आहे तो या दोन वाक्प्रचारांत आहे. आणि 'प्राण हा सर्वथा फुटो पाहे' असं म्हटलं की 'हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले' या ओळीला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो.
आता 'आनंदघन'च्या चालीत हे शब्द गाऊन पहा आणि मग शब्द का बदलले असतील याचा अंदाज येतो. या गाण्यात केवळ दुःख नाहीये, तर आकांत आहे, आक्रोश आहे. कान्होपात्रेचे खरे शब्द सापडले याचा आनंद मला झालाच पण एक कमालीची अस्वस्थताही आली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातून मी चालत घरी आलो ते कान्होपात्रेचे शब्द गातगातच! रस्त्यात आपल्या मोठ्याने गाताना लोक विचित्र नजरेने आपल्याकडे पाहात असतील याचं भानही मला नव्हतं! घरी पोहोचेपर्यंत या अभंगाला चाल लागली होती.
ही चाल करताना माझ्या मनात आनंदघनच्या चालीबद्दल कायम आदरच होता. या बुजुर्गांच्या खांद्यावर बसूनच मी हे जग पाहतोय याची मला जाणीव आहे. पण शब्द वेगळे असले की संगीत कुठे त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन जाईल ते मला पहायचं होतं.
पुढे गजेन्द्र अहिरेच्या 'नॉट ओन्ली मिसेस राऊत' या चित्रपटात आपल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराने व्याकुळ झालेली आई असं पात्र होतं आणि मला या अभंगाची आठवण झाली. मी गजेन्द्रला म्हटलं इथे मुद्दाम गाणं लिहिण्याऐवजी हा अभंग करूया. संजीव चिम्मलगी या प्रतिभावंत गायकाकडून ते गाणं गाऊन घेतलं.
(संपादित)
कौशल इनामदार
छंद ओठांतले भाग ४
सौजन्य- kaushalsinamdar.in
(Referenced page was accessed on 29 May 2021)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.