होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
पिल्लास दु:ख भारी भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी सांगेल ते कुणाशी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वराविष्कार | - | ∙ आशा भोसले ∙ मधुबाला जव्हेरी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | सुखाचे सोबती |
राग | - | भीमपलास |
गीत प्रकार | - | भावगीत, चित्रगीत, बालगीत |
टीप - • स्वर- आशा भोसले, संगीत- श्रीनिवास खळे. • स्वर- मधुबाला जव्हेरी, संगीत- वसंत पवार, चित्रपट- सुखाचे सोबती. |
एक सर्वांगसुंदर गीत.. याबरोबरच याच्याशी संबंधित ज्या संगीतेतर गोष्टी आहेत त्याही खूपच विशेष आहेत आणि त्या फारच थोड्यांना माहीत आहेत.
या गीताच्या तीन आवृत्या झाल्या. गीतकार ग. दि. माडगूळकर यांचे हे गीत, वेगवेगळ्या प्रसिध्द संगीतकारांच्या चालींवर वेगवेगळ्या प्रसिध्द गायक–गायिकांनी गायलं आहेत.
पहिली आवृत्ती, जिचे संगीतकार आहेत वसंत पवार आणि गायिका मधुबाला जव्हेरी.
दुसरी आवृत्ती, जी सगळ्यात लोकप्रिय आहे, तिचे संगीतकार आहेत श्रीनिवास खळे आणि गायिका आशा भोसले.
आणि सर्वात नंतरची, संगीतकार नंदू घाणेकर आणि गायक आहेत रवींद्र साठे.
आहे न सगळं मनोरंजक ! आता आपण याच्या मुळाशी जाऊया.
'एका तळ्यात होती..'च्या आरंभाच्या वेळच्या ज्या विविध उपकथा आहेत त्यातली एक अशी की हे गीत 'लक्ष्मीपूजन' या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकरांनी लिहिलं. श्रीनिवास खळ्यांना संगीतकार म्हणून प्रथम संधी मिळालेला हा चित्रपट होता. या आणि चित्रपटातल्या काही अन्य गाण्यांसाठी आशा भोसले यांचं नावही ठरलं आणि अचानक खांदेबदल झाला. निर्माते, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, सगळेच बदलले. चित्रपटाचं नावही बदललं आणि 'सुखाचे सोबती' असं नवीन नाव आलं. प्रथम ठरलेले कलाकार साहजिकच निराश झाले. 'एका तळ्यात होती..'साठी संगीतकार वसंत पवार आणि गायिका मधुबाला जव्हेरी यांची नावे निश्चित केली गेली.
दरम्यान, खळेसाहेबांनी 'एका तळ्यात होती' आणि 'गोरी गोरीपान फुलासारखी छान' ही 'लक्ष्मीपूजन' साठी ठरलेली गाणी एच.एम.व्ही. या खाजगी ध्वनिमुद्रण कंपनीतर्फे ध्वनिमुद्रित करून घेतली. दोन्ही गाणी आशा भोसले गायल्या, जी गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत.
त्या काळी तर या दोन गाण्यांनी सगळीकडे बहार उडवली आणि एक समस्या निर्माण झाली. 'सुखाचे सोबती' च्या निर्मात्यानी खळे साहेबांना नोटीस पाठवली. कारण ती गाणी त्यांच्या चित्रपटासाठी होती आणि ती अशी खाजगीरीत्या व्यावसायिक पातळीवर प्रकाशित करणं हा गुन्हा होता. त्या काळात चित्रपट वर्तुळात खूप दबदबा असलेल्या ग. दि. माडगूळकरांची खळेसाहेबांनी मदत घेतली. गदिमांनी त्यांचं वजन वापरून चित्रपट निर्मात्याला ती नोटीस मागे घ्यायला भाग पाडलं आणि संकट दूर झालं. प्रस्तावित 'सुखाचे सोबती' चित्रपटातल्या ध्वनिमुद्रिका प्रकाशितच झाल्या नाहीत. त्यामुळे वसंत पवारांचं मधुबाला जव्हेरी यांनी गायलेलं 'एका तळ्यात होती..' केवळ चित्रपटातच ऐकू येतं.
सुमारे दहा वर्षांपूर्वी आलेल्या तीसर्या आवृत्तीचे संगीतकार होते नंदू घाणेकर. संगीत संयोजक होते आजचे प्रतिभावंत, गुणी संगीतकार अजय–अतुल. ते गायलं होतं रवींद्र साठे
१९५४ च्या 'दोस्त' साठी 'दिल देके बहोत पछताये' आणि 'अपनी इज्जत' साठी तलत मेहमूद यांच्याबरोबर 'दिल मेरा तेरा दिवाना', मराठीत 'वैजयंता' मधे वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर 'सप्रेम नमस्कार' अशी गोड गाणी गायलेल्या मधुबाला जव्हेरी आणि हेवा करावा असा पुरुषी स्वर असलेले रवींद्र साठे हेसुद्धा अप्रतिमच गायलेत पण बाजी मारली आशा भोसले यांच्या गाण्याने.
एका राजहंसाची गोष्ट किती सोप्या पण कल्पक रीतीने गदिमांनी मांडलीय ! 'कोणी न त्यास घेई खेळावयास संगे' अशी कटू सुरवात झालेल्या गोष्टीचा सुखांत 'त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक' असा करणारे महाकवी गदिमा आणि तितकीच सोपी चाल लावणारे श्रेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्यामुळे आशा भोसलेंचं 'एका तळ्यात होती' चा जवाब नाही ! सुरवातीच्या दोन अंतर्यात असलेली कटुता आशाताई कुठेही जाणवू देत नाहीत कारण ते एक बालगीत आहे याचं पूर्ण भान त्यांच्या लडिवाळ स्वरात दिसून येतं.
या गाण्याची सोपी चाल हे एक मृगजळ आहे. गदिमांच्या सहज, सोप्या शब्दांमुळे ती चाल सहज गुणगुणता येते हे खरं पण त्या चालीतल्या हरकती, मुरक्या, श्वासनियंत्रण हे सगळं अचाट आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या गाण्यातली अभिव्यक्ती ! एका निरागस पिल्लाचं मनोगत व्यक्त करताना आशाताई जे गायल्यात ते अद्वितीय आहे. म्हणूनच गाणं सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत आपण हरवून गेलेले असतो, अश्रूंना खंड नसतो.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता. गदिमांचा जन्म अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब कुलकर्णी परिवारात झाला. आटपाडी जवळचे माडगूळे हे गदिमांचे गाव. वडील औंध संस्थानात कारकून होते. गदिमांचे आजोबा मोठे कर्तुत्ववान. ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले "बाळ, यापुढे काळ कठीण आहे. तुझा नवरा साधू-संत आहे. आज मिरची आणली तर चार दिवसांनी मीठ आणेल.. तुलाच यापुढे खंबिर व्हायला हवे.." झालेही तसेच. अठराविश्व दारिद्र्य गदिमांची वाटच पहात होते. न देवाने रुप दिले होते न आर्थिक सुबत्ता. दहावीत गणिताने घात केला व पुढे शिकावे इतका पैसा व बळही त्यांच्या जवळ नव्हते पण एक दिवस घडलेल्या प्रसंगाने त्यांच्यातला राजहंस जागा झाला.
गदिमांच्या वडलांची 'कुडंल' या गावी बदली झाली होती. गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य. गावाजवळच्या ओढ्यामधून पाणी भरुन आणायला लागायचे. गदिमांनी कुमार वयात प्रवेश केला होता. अर्धवट वय. ज्यावेळी मनात एक धगधग असते, अन्याय-गरीबी, जग सगळ्यांविषयी एक विचित्र पेटती भावना मनात उत्पन्न होत असते, याच वयात एक दिवस गदिमा असेच गावातल्या पोरांबरोबर हुंदडत चालले होते. समोरुन ओढयावरुन कळशीत पाणीभरून त्यांचे वडील घराकडे चालले होते. त्यांना दम्याच्या त्रास होता. धापा टाकतच ते चालले होते..
गदिमांनी ते बघितले व त्यांचा राग मस्तकात गेला. तावातावाने ते वडिलांजवळ गेले व कळशी त्यांचा हातातून ओढून घेतली. तसेच तडक घरी गेले. कळशी ठेवली व घरातले प्रत्येक भांडं न् भांडं त्यांनी ओढ्यावरुन पाणी आणून भरायला सुरवात केली. अगदी वाटी-पेल्यांपर्यंत सर्व भरुन झाले. गदिमांची आई हे सर्व बघत होती ती हसून म्हणाली "अरे अण्णा, आता देवाची पळी तेवढी भरायची राहिली रे ! तुझे वडील पाणी भरत होते तर पुरत नव्हते. आज तू पाणी आणलेस तर घरात पाणी ठेवायला जागा राहिली नाही.." आईच्या बोलण्यातली सुचकता गदिमांनी अचूक ओळखली. आपले वडील आता थकले आहेत, संसाराचा भार त्यांना एकट्याला पेलवत नाहीये, आपल्यालाही आता काहीतरी करायला हवे याची जाणीव त्यांना झाली व वयाच्या केवळ १७-१८ व्यावर्षी ते घर सोडून पुढच्या वाटचालीसाठी कोल्हापूरला चित्रपटसृष्टीत आले.
पुढे काही दिवसांनी गदिमांच्या वडिलांची कुंडल गावावरुन बदली झाली. त्याकाळात बैलगाड्यांवरुन सामान नेत असत. कुलकर्णी कुटुंब आवरा-आवरी करुन निघाले पण गावातल्या लोकांनी गाड्या अडवून धरल्या. गावात देणी खूप झाली होती व ती फेडल्याशीवाय जायचे नाही असे सावकार लोक सांगत होते. मोठी पंचाईत झाली. गदिमांच्या आईने छोट्या व्यंकटेश (गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर) ला सांगितले "अण्णाला पत्र पाठवून बोलावून घे." त्यांनी गदिमांना पत्र लिहीले. छोटा व्यंकटेश दररोज संध्याकाळी एसटीच्या वाटेवर डोळे लाऊन आपल्या भावाची वाट पहायचा. त्याला खात्री होती आपला आण्णा येईल व आपल्याला संकटातून सोडवेल. ३-४ दिवस झाले व एके संध्यांकाळी आपल्या लाडक्या अण्णाची सावळी आकृती दुरुन येताना दिसली. गदिमा आले व त्यांनी गावातली सर्व देणी एकहाती देऊन टाकली व गदिमांच्या कुटुंबाच्या गाड्या कुंडल गावातून बाहेर पडल्या.
काही दिवसांपूर्वी तावातावाने वडिलांच्या हातून कळशी घेणार्या गदिमांच्यातल्या कुरुप पिल्लाचा आज राजहंस झाला होता. याच राजहंसाने पुढे मराठी साहित्यात व मराठी चित्रपटसृष्टीत एक स्वत:चे अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले.
"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक.."
प्रत्येकाला आपले वाटणारे गदिमांचे हे सुंदर गीत. मुळ 'सुखाचे सोबती' या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिले होते. पण चित्रपट काही कारणाने रखडला व श्रीनिवास खळे यांनी 'गोरीगोरीपान' व 'एका तळ्यात होती' दोन बालगीतांना चाली लावल्या व त्याकाळच्या एच.एम.व्ही. या कंपनीकडे गेले. सुरवातीला त्यांनी या गाण्याची टर ऊडवली की "हे काय गाणे आहे? बदके काय? पिल्ले काय?.." पण गदिमा व खळे ठाम होते. गदिमांचा दबदबा नुकताच वाढायला लागला होता. चित्रपटाच्या आधी ही रेकॉर्ड निघाली व हे गाणे प्रचंड गाजले.. आशा भोसलेंचा मधुर आवाज व श्रीनिवास खळे यांचे सुंदर संगीत या गाण्याने खूप लोकप्रियता मिळविली. पुढे 'सुखाचे सोबती' चित्रपटातही हे गाणे प्रसिध्द झाले. त्याला वसंत पवार यांचे संगीत होते तर मधुबाला झवेरी यांनी ते गायले होते.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.